रविवार, २४ मार्च, २०१३

नेमाडेंना इतिहासाची शिस्त नको, पण इतिहास वळवायचा आहे.

---------------------------------------------------------------------------
नेमाडेंना इतिहासाची शिस्त नको, पण इतिहास हवा तसा वळवायचा आहे.
--------------------------------------------------------------
    पार्ल्याच्या एका देशीवादाच्या भाषणात मी नेमाडेंना प्रश्न विचारला होता की तुम्ही हिंदूत ज्ञानेश्वरांची, रामदासांची, बुद्धाची जी टिंगल केली आहेत ते पुस्तक खपावे म्हणून केले आहे काय ? ह्यावर ते म्हणाले होते की टिंगल करायचा त्यांचा उद्देश नव्हता, पण सामाजिक संदर्भ उपलब्द असावेत म्हणून त्यांची हिंदू त योजना केलेली आहे. ह्याच हिंदू च्या प्रमोशन मध्ये ज्या ज्ञानेश्वरीची मुंबई विद्यापीठाने संशोधन करून आवृत्ती काढली त्या राजवाडेंबद्दल "हा म्हातारा इतका धूर्त होता की त्याने पदरच्या ओव्या घुसडल्या असल्या पाहिजेत अशी शंका येते" असे म्हटले आहे. जर लक्षपूर्वक पाहिले तर नेमाडे हे निबंध क्वचितच लिहितात. कारण निबंधात तर्काचे, योग्य संदर्भांचे बंधन येते व पुरावे द्यावे लागतात. त्यामानाने कादंबरीत काहीही ठोकून द्यायची मुभा असते. त्यामुळे कादंबरी लेखन हे नेमाडेंचे एक प्रकारे इतिहासाचे पुनर्लेखनच आहे. अर्थात ते तसे करण्याची त्यांना मुभा व अधिकार आहेच. पण नामदेवांना मध्यवर्ति स्थान हवे असे म्हणताना ऐतिहासिक लेखन न करता भावनिक आवाहन करणे हा एक व्यूहाचाच भाग होतो. जसे हिंदूत नेमाडेंनी महानुभाव पंथाच्या नायकाच्या आत्येला केंद्रस्थानी आणले आहे.
    नेमाडेंची जात वा धर्म काढणे हे तसे प्रशस्त नाही. पण मनोविश्लेषणात्मक समीक्षेच्या अंगाने ते स्वत: महानुभाव पंथाचे असल्याने त्याचे त्यांच्यावर काही प्रभाव उमटले असतील का हे पाहणे रास्त ठरावे. शं.गो. तुळपुळे ह्यांच्या ग्रंथात नुसती श्रीकृष्ण-स्वयंवराची प्रकरणे पाहिली तर दिसते १) नरेंद्र व नृसिंह यांची रुक्मिणीस्वयंवर काव्ये २) संतोषमुनीचे रुक्मिणीस्वयंवर ३) कृष्णमुनि-कविडिंभ-कृत नवखंड-रुक्मिणीस्वयंवर ४) लक्षधीर-कृत रुक्मिणीस्वयंवर ५) एल्हाणाचे रुक्मिणीस्वयंवर ६) हंसबा स्वयंवर इतकी ती मुबलकपणे असताना नेमाडेंच्या  एकमेव समीक्षाग्रंथाचे शीर्षक "टीकास्वयंवर" असावे हे ह्याच प्रभावाचे लक्षण दाखवते. तसेच इतिहास आपल्याला पाहिजे तसा लिहायला हवा हे महानुभाव पंथात सवयीचे असले पाहिजे अशा अर्थाची मराठी विश्वकोशातली ही टिप्पणी पहा : "भासकरभट पंथाचे आचार्य असताना, मुसलमानी आक्रमाच्या काळात ते कोकणात जात असताना, लीळाचरित्र, ऋद्धिपुरचरित्र, स्थानपोथी इ. ग्रंथांच्या अधिकृत पोथ्या चोरांकडून लुबाडल्या गेल्या. त्यानंतर हिराइसा आदी अनेक शिष्यांकडून आपापल्या आठवणीप्रमाणे त्यांचे पुनर्लेखन करण्यात आले. ते करताना त्यांनी इतरांच्या ‘वासना’ ही नमूद केल्या. त्यामुळे या ग्रंथांत अनेक पाठभेद निर्माण झाले आणि पुढेपुढे त्यांत अधिकाधिक भर पडत गेली. "* ( लिहिण्यातल्या चुका मुळातल्याच आहेत. मी फक्त कॉपी पेस्टले आहे ). आता असे महानुभाव पंथात घडत असेल तर साहजिकच त्यांना हिंदूंच्या ग्रंथातही असे व्हावे असे वाटू शकते व त्याच प्रमाणे त्यांचे व्यूह असणे स्वाभाविक ठरावे. असेच आता अनेक संतांचे भाग्य ते उजळू शकतील !
-----------------------------------------------
* पहा "मराठी विश्वकोशातले हे पान : लिंक : http://marathivishwakosh.in/khandas/khand12/index.php?option=com_content&view=article&id=10505

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा