मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०

नेमाने नेमाडे--२०
मी बोलेन ते प्रमाण !
नेमाडेंचे एक लाडके प्रतिपादन आहे की लोक प्रमाण भाषा होऊ देतात, ही खरं तर बोली भाषा बोलणार्‍यांची सहनशीलता आहे. त्यामुळे ते बोली भाषेत लिहिण्याचे खंदे समर्थक आहेत. म्हणूनच त्यांच्या सर्व कादंबर्‍या अशा स्व-रचित बोली भाषेत असतात.( नशीब आपले की त्यांचे टीका वाङमय तरी प्रमाण भाषेतच असते.). त्यांचा भाषेच्या बोलपणावर इतका दाट भर आहे की कोणी अलंकारयुक्त भाषा वापरली की नसता अर्थ अलंकाराद्वारे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ते त्या लेखकावर तुटून पडतात. बरे आजकाल भाषाशास्त्रावरचे पढित व ब्राह्मण नसलेले विद्वान फारसे कोणी शिल्लक नसल्याने किंवा उगाच कुठे खोड काढा ह्या भीतीने , ह्या प्रांतात त्यांना रान मोकळे आहे.
एक सामान्य वाचक म्हणून थोडा विचार करून पहा. सर्व कादंबरी एकाच बोली भाषेत ते का लिहीत नाहीत ? नायकाची स्वगते कधी बोली भाषेत तर त्याची ठाम निष्कर्शे, नैतिक भूमिका, ह्या अतिशय भारदस्त अशा प्रमाण भाषेत असतात. "हिंदू"मध्ये तर हे दोलायमान होण्याचे प्रमाण फारच सारखे होत राहते. आशयसूत्राला अनुसरून भाषेचा आवाका मी निवडतो, असे ते म्हणतात. आता कादंबरीचे कथानक असे आहे की त्याच्या निवेदनाला कुठलीही भाषा चालावी. कारण नायक शिक्षित आहे, शहरी आहे, तर बर्‍याच वेळा तो भूतकाळातले बोलत राहतो व बोलीभाषा निवडतो. हे शैली साठी का काही निश्चित हेतु धरून हे सहज समजू शकते. नेमाडेंची प्रमाण भाषेवरची हुकुमत निर्विवादच आहे. त्यांच्या लोकमान्यतेत ह्या प्रमाण भाषेवरच्या प्राबल्याचे खासे महत्व आहे. आणि हे ते निश्चितच जाणत असावेत. त्यामुळेच त्यांनी प्रमाण भाषा ज्यास्त करून वापरणे साहजिकच ठरते.(कोणी अभ्यास केलाच तर प्रमाण भाषा कमीतकमी ७० टक्के भरेल.). ते खपाच्या दृष्टीनेही सोईचे आहे. तसेच बोली भाषेबद्दल रोमॅंटिक कल्पना बाळगणे चांगले दिसणारे असले तरी वाचकाला ते अंगवळणी न पडणारे आहे. त्यामुळेच १५ हजार खपलेल्या प्रतींचा आढावा घेतला तर बहुतांशी वाचक हे पहिल्या शंभर पानातच अडकलेले व मग तिथून पुढे न धकलेले आढळून येईल. ( अर्थात ज्यास्त लोकांनी वाचले तर तो काही महान साहित्याचा मापदंड होत नाही. कोणीच वाचत नाही अशा पुस्तकांना साहित्य अकादेमीचे महानतेचे पुरस्कार मिळत असतातच.). पण रॉयल्टी ही खपावरच असल्यामुळे समृद्ध अडगळीसाठी हे धोरण बरे पडते.
शिव्यांचा वापर करताना त्या भावनेची तीव्रता दर्शवितात हा हातखंडा होरा असतो. पण भावना वा प्रतिक्रिया प्रमाण भाषिकांना दाखविता येतात व बोली भाषकांना शिव्याच वापराव्या लागतात असा दंडक न्यायाचा नाही. प्रमाण भाषकांनी अलंकारिक भाषा वापरली तर ते भिकार साहित्य व बोली भाषकांनी शिव्या वापरल्या तर ते महान असा कायदा हा "हम करेसो कायदा" होईल. इथे बोली भाषकांनी शिव्या न वापरता का थोडे सहनशील होऊ नये ? शिव्यांनी पटकन लक्ष वेधल्या जाते हा परत किफायतीचाच मार्ग होतो.
मी बोलेन ते प्रमाण हा ह्यावरचा खासा तोडगा नेमाडे काढतात.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा