बुधवार, ७ सप्टेंबर, २०११

साहित्यिक समीक्षा सिद्धान्त आणि नेमाडेंची "हिंदू" --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- "क्रिटिकल थियरी" किंवा "लिटररी थियरी" नावाचा विषय साहित्याच्या उच्च शिक्षणात असतो व असले विषय समजणार्‍यांभोवती, खरे असो वा खोटे, एक प्रकारच्या आदराचे वलय असते. अशांना उंच ठिकाणी ( जसे सिमला वगैरे ) मानाच्या व चांगल्या पगाराच्या नोकर्‍या मिळतात, ज्यामुळे ते कित्येक वर्षे नवीन साहित्य निर्माण न करता, आपल्या मागील शिदोरीवर मिरवू शकतात. कालांतराने ह्याच साहित्यिक समीक्षा सिद्धान्ता-बरहुकूम ते नवीन साहित्य प्रसवतात व ते सामान्य वाचकाला समजले नाही तरी, ते सिद्धान्त जाणणार्‍यांच्या उच्च वर्तुळात अति-आदर पावतात, पुरस्कार पावतात. आपण मोठ्या अपेक्षेने अशी पुस्तके विकत घेतो, वाचण्याचा प्रयत्न करतो, आणि न समजल्यावर अशाच वर्तुळातल्या कोणाच्या, मोठेपणाच्या पावतीवर डोलत, शिक्कामोर्तब करतो. आपण हे जसे नकळत करतो त्याविरुद्ध कळून सवरून हे कसोटीचे साहित्यिक सिद्धान्त जाणणारे लोक त्यावर अशी पुस्तके बेततात व मानमरातब पावतात. ह्या मागे जे हे मोलाचे कसोटीचे साहित्यिक सिद्धान्त असतात त्यांची आपण ओळख करून घेऊ व हेच कसे "हिंदू" ह्या भालचंद्र नेमाडेंच्या कादंबरीला लागू होतात ते पाहू. ह्या निमित्ताने कसोटीच्या साहित्यिक सिद्धान्तांची आपल्याला ओळख होईल व ते कसे कलाकृतीला लागू करावेत ह्याचा सरावही होईल. ( ह्या उहापोहासाठी "क्रिटिकल थियरी टुडे" हे इंटरनेटवर उपलब्द असलेले लुइस टायसन ह्यांचे पुस्तक आधाराला घेतलेले आहे . ) साहित्याच्या कसोटीसाठी जे साहित्यिक सिद्धान्त वापरले जातात ते असे असतात : १) मनोविश्लेषणात्मक समीक्षा २) मार्क्सवाद आणि सामाजिकतेची समीक्षा ३) स्त्रीवाद आणि लिंगभेदाची समीक्षा ४) आधुनिकता/न्यू क्रिटिसिझम्‌ वा उत्तर आधुनिकतेची समीक्षा ५) वाचकवादाची समीक्षा ६) संरचनावाद, चिन्हात्मकतेची समीक्षा ७) उत्तर-संरचनावाद / विरचना समीक्षा ८) नव-इतिहासवाद व सांस्कृतिक समीक्षा ९) समलिंगी, गे,व विचित्र समीक्षा १०) आफ्रिकन-अमेरिकन वा वर्णवादाची समीक्षा ११) उत्तर वसाहतवाद. क्रमवारीत थोडयाफार फरकाने हेच मुद्दे श्री.मिलिंद मालशे व अशोक जोशी लिखित "आधुनिक समीक्षा-सिद्धान्त" ( मौज प्रकाशन ) ह्या पुस्तकातही पहायला मिळतात. एखाद्या कलाकृतीकडे वा साहित्याकडे समजूतीच्या सोयीसाठी, लावावयाचे हे जणु चष्मेच असतात, असे म्हणतात. म्हणजे त्या सिद्धान्तापुरते आपण त्याच नजरेने पाहू शकतो व साहित्य जोखू शकतो. मुळात साहित्य असतेच कशासाठी व ते आपण वाचावे का ? हा आपल्याला पडलेला आदिम सवाल असतो. साहित्य वाचल्याने आपल्या अनुभवाच्या कक्षा रुंदावतात . असे म्हणतात की आयुष्यात आपण जसजसे ज्यास्त अनुभवी होऊ लागतो, चार पावसाळे ज्यास्त पाहतो, तसतशी साहित्यात अनुभव घेण्याची आपली क्षमता वाढते. वरील समीक्षांचे सिद्धान्त एखाद्या कलाकृतीला लावून, ती कलाकृती फसलेली आहे ( किंवा कसे ), असे दाखविले तरी त्यानिमित्ताने समीक्षा पद्धतीतल्या सिद्धान्ताची आपल्याला ओळख होते. शेवटी प्रत्येक साहित्यिक आपले साहित्य निर्माण करीत असताना त्याच्या दृष्टीने जे अंतिम सत्य वा सुंदर आहे त्याचाच माग काढीत असतो व तो प्रयत्न फसलेला आहे असे समीक्षा-सिद्धान्ताने दिसले, तरी त्यानिमित्ताने सत्य वा सुंदर कसे असते, ह्याची जाण होऊन, आपल्या साहित्यिक अभिरुचीच्या कक्षा रुंदावतात हा फायदाच आहे. तसा तो तुम्हा-आम्हाला होवो ! ( क्रमश: १ ) -------------------------------------------------------------------------------------------- मनोविश्लेषणात्मक समीक्षा सिद्धान्त आणि हिंदू : --------------------------------------------------------------------------------------------------- मनोविश्लेषणात्मक समीक्षा सिद्धान्त इतके आता रुळलेले आहेत की सामान्य जनताही ते जाणते. उदा: खेड्यापाड्यातील लोकही म्हणतात, काय राव वड्याचं तेल वांग्यावर काढताय का ? कोणाचा राग कोणावर काढताय ? आणि मनोव्यापारांचे प्राबल्य आपण इतके कबूलतो की एक रोगी केवळ विलपॉवरने कॅंन्सरला चांगले तोंड देतो तर फाईव्ह-स्टार हॉस्पिटलातही मनाने हरलेला रोगी सहजी दगावतो ह्यात आपल्याला काहीच वावगे वाटत नाही. मनोविश्लेषणात्मक सिद्धान्त फ्रॉइड सारख्या डॉक्टराने आपल्या अनुभवातून रूढ केलेले असल्याने ते आजकाल सार्वत्रिक मान्यता पावलेले आहेत. जसे: आपण इच्छांचे दमन करतो, त्यांचे उन्न्यन वा उदात्तीकरण करतो, त्यांचे दुसर्‍यांवर प्रक्षेपण करतो, त्यांच्या समर्थनासाठी आपले एक खासे बचावतंत्र तयार करतो, ह्यासाठी आता आपण काही पुरावे मागत नाही इतके ते सर्वमान्य आहेत. फ्रॉइडने विस्मृती व स्वप्नकृती ह्यांचेही स्पष्टीकरण बरेचसे पटण्यासारखे दिलेले आहेत. इतर मनोवैज्ञानिक कल्पना आहेत स्थानांतरण ( डिस्प्लेसमेंट ), संक्षिप्तिकरण ( कन्डेंसेशन ), दुसर्‍या स्तरावरील विस्तृतीकरण ( सेकंडरी इलॅबोरेशन ). फ्रॉइडच्या मोलाच्या कल्पना आहेत जाणीव ( कॉन्शस ) व नेणीव ( अनकॉन्शस ) आणि त्यातही त्याने नेणीवेला ज्यास्त महत्व दिले आहे. "हिंदू"ला मनोविश्लेषणात्मक समीक्षा लागू करणे अजून एका कारणासाठी प्रशस्त आहे. कारण लेखकाने कबूल केल्याप्रमाणे हे आत्मचरित्रात्मक साहित्य आहे. इतके की त्यातला नायक खंडेराव जिथे राहतो त्या के.बी.देशपांडेंचा बंगला औरंगाबादी मी व अनेक जणांनी पाहिलेला आहे. त्यामुळे इथे लेखक व नायक ह्यांच्यातला आंतरपाट समीक्षेने काढायची गरज न पडता वाचकाला सहजी काढता येतो. मनाच्या अनेक व्यापारांपैकी दुसर्‍याला इजा ( व्हायलेंस ) करण्याच्या माणसाच्या मूळ प्रवृत्तीचे एक दर्शन घेऊ. वास्तवात नेमाडे हे अपयशी प्राध्यापक होते हे त्यांनी बिढार ह्या कादंबरीतही चित्रित केलेले आहे. त्या चित्रणात त्यांना वर्गात पोरे जी त्रास देतात त्यावर खरे तर एखाद्या अभ्यासू वृत्तीच्या प्राध्यापकाने पब्लिक स्पीकिंग मध्ये नैपुण्य कमव, शिकवण्यातले काही हातखंडे शीक, असा मार्ग अवलंबला असता. पण इथे नेमाडे अगदी सोपा मार्ग अवलंबतात व एका टारगट पोराला वर्गात श्रीमुखात लगावून देतात व त्यामुळे इतर मुले चपापतात, असे नमूद करतात. ही नेमाडे ह्यांची एक सूप्त वृत्तीच झालेली आहे, असे त्यांचे टीकावाङमय वाचून कोणाही चाणाक्ष वाचकाच्या लक्षात येईल. खरे तर वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी नेमाडेंची पहिलीच कादंबरी "कोसला" ही मराठी सारस्वताने वाखाणली, उचलून धरली. त्याने एखाद्याने जरा मवाळ धोरण धारण केले असते. पण नेमाडे चपराक लगावून देण्याच्या वृत्तीचे. त्यांनी टीकास्वयंवरात सर्व प्रस्थापित मंडळींना यथेच्छ बदडून काढलेले दिसेल. अगदी पु.ल.देशपांडेंनाही त्यांनी सोडलेले नाही. वर्गातल्या टारगट पोराला थोबाडीत दिल्यावर जसे सगळे कॉलेज चपापले, तसेच टीकास्वयंवरातल्या घायाळ व चौफेर टीकेने मराठी सारस्वत गळाठले व तेव्हापासून नेमाडे प्रस्थापित "लेखकराव" झाले. नुसती बंडखोरी वेगळी व चपराक लगावणे वेगळे. महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांचे स्थान अतीव आदराचे असून सर्वच जण त्यांना "माऊली"चा दर्जा देतात. ज्ञानदेवे रचला पाया, असे वारकरी संप्रदाय व भक्तिमार्ग मानतात. ज्ञानेश्वरांनी वर्णव्यवस्थेचे त्या काळात समर्थन केले ह्या दूषणापायी अनेक मान्यवरांनी त्यांच्याशी वाद घातलेला आहे. अलिकडच्या काळात कवी विंदा करंदीकरांनी "अमृतानुभव"च्या अर्वाचीनीकरणाच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रदीर्घ वाद घातलेला आहे. पण ज्ञानेश्वरांना चपराक मारण्याचे धारिष्टय फक्त नेमाडेच करू जाणे. कारण हे मूळ स्वभावाने होते आहे. त्याचे हे उदाहरण पहा :"हिंदू" ह्या कादंबरीतले पृ.१५६ वरचे हे भाष्य पहा: "एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्‍यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. " ज्ञानेश्वरीच्या अध्याय १३ त ओवी ७१५-७१७ मध्ये विद्या व वय ह्यांच्या उन्मादाने माणुस कसा गर्व करीत छाती काढून चालतो व माझ्यासारखा मोठा कोणी नाही असा शिवभक्तांना असतो तसा गर्व( शिवमुष्टीगंडु, गुंडु नव्हे) धारण करतो व मग त्याला चांगले बघवत नाही अशा अर्थाच्या ह्या ओव्या मुळात अशा : म्हणे मीं चि येकु आथि । माझा चि घरिं संपत्ति । माझी आचरती रीती । कोण्हासी नाही ॥ नाहिं माझे नि पाडे वाडु । मी चि सर्वज्ञु एकु रूढु । ऐसा शिवमुष्टिगंडु । घेउनु ठाके ॥ व्याधिलेया माणसा । न ये भोगु दाखवुं जैसा । नीके न साहे तैसा । पुढिलाचे ॥. आता ह्यात वेसकराने काय दाखवले त्याचा व का दाखवले त्याचा हा कसा काय दृष्टांत होतो. काव्यात दृष्टांत म्हणजे जे निवेदन केले त्याच्या समर्थनार्थ दुसरे तसेच एखादे उदाहरण देणे.काव्यशास्त्रात दृष्टांत अलंकाराची व्याख्या करताना म्हणतात की "विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो." इथे मूळ गोम "त्याच अर्थाचा दाखला" ही आहे. ज्ञानेश्वर म्हणत आहेत गर्व, ताठा बाळगू नका. त्याचा अर्थ त्यांनी ताठा दाखवला, असा आपण काढू शकत नाही. काढलाच तर ते अज्ञानाचे वा खोडसाळपणाचे लक्षण होईल. इथे हा वेसकर फक्त ब्राह्मणांच्या दारासमोर जाऊन काही दाखवीत नाही आहे. शिवाय कोणाही मानसशास्त्रज्ञाला विचारा, अत्याचाराच्या दाबाची प्रतिक्रिया अशी नसते. शाळेत लहान मुले असा व्रात्यपणा करतात तो अर्धवट लैंगिक कुतुहुलातून असतो.तर पुष्ट्यर्थ फ्राइड ह्या मानसोपचारतज्ज्ञाचा निर्वाळा आहे. जेव्हा कोणी असे वागतो तेव्हा मानसशास्त्र सांगते की ती एक विकृती असून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न ( अटेंशन डेफिशियन्सी सिन्ड्रोम ) असतो. किंवा क्वचित प्रसंगी, समजा आपण बाथरूम मध्ये टॉवेल न्यायला विसरलो, व पॅसेजमधला वाळत टाकलेला टॉवेल घ्यायला तसेच बाहेर आलो, तर असे अपघाताने होते. काही ठिकाणी ( जसे अमेरिकेत मोठमोठ्या क्लबातून सामूहिक बाथरूम मध्ये) लोक नागडयाने वावरू धजतात. पण बाहेर योग्य कपडे घालूनच येतात. कधी कधी क्रिकेट मॅच दरम्यान कोणी नागडयाने मैदानावर पळतो. त्याला मग पोलीस अटक करतात. ह्या सर्व प्रतिक्रियांमध्ये कुठले दाब उफाळून येण्याचे दिसत नाही. हां, लेखकाने जर कथानकात असे दाखविले असते की हा वेसकर निवडून ब्राह्मणांच्या घरांसमोर जाऊन असे करायचा किंवा ब्राह्मण व्यक्ती दिसल्या की त्यांच्या समोर असे करायचा तर "दाब वर येणे" शक्यतेतले होते.त्यामुळे हे अनुमान शक्यतेतल्या कोटीचे वाटत नाही. कादंबरीतले लिखाण हे प्राय: एक ललित लिखाण व काल्पनिक असते. पण नेमाडे कबूलतात की ही आत्मचरित्रपर कादंबरी असून आदर्श अशा "यमुनापर्यटन" टाइप कादंबरीत असते तसे निश्चित नैतिक भूमिका घेऊनच हे चितारलेले आहे. नेमाडे म्हणतात: "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). शिवाय कादंबरीच्या प्रमोशन मध्ये नेमाडेंनी स्टार माझा वर जी प्रदीर्घ मुलाखत दिली त्यातही म्हटले होते की हिंदू धर्म ब्राह्मणांनी बिघडवला. त्यामुळे जे लिहिले आहे ते पूर्ण समजून-उमजून , निश्चित नैतिक भूमिकेतूनच लिहिलेले आहे. शिवाय फ्राइड व खुद्द ज्ञानेश्वरांच्या काही ओळी उदधृत करून ते असे मांडत आहेत की ही ब्राह्मणांनी केलेल्या अत्याचारावरची ही रास्त प्रतिक्रिया आहे. जसे काही खुद्द ज्ञानेश्वरांच्या ओवीमधूनच हे सिद्ध होते. ब्राह्मण-द्वेष समाजशास्त्री व मनोवैज्ञानिक एकवेळ रास्त ठरवतीलही. पण लेखकाचा ब्राह्मणद्वेष नायकात, कादंबरीत दिसत नाही. तो महानुभाव पंथाच्या आत्याच्या संन्याशीण होण्याच्या उदात्तीकरणात इतका रंगलेला आहे की तो कादंबरीत ब्राह्मणांची प्रसंगी तारीफही करतो. पण चपराक देण्याची मूळ प्रेरणा लेखक इथे ज्ञानेश्वरांवरही वापरतो. हे मात्र फ्रॉइडच्या मनोविश्लेषणाने, मूळ प्रवृत्तीने, झाले असेल असे वाचकाच्या लक्षात येईल. ह्याचे अजून एक उदाहरण आहे, हिंदूची प्रकाशनपूर्व नेमाडेंची मुलाखत. त्यात ते राजवाडेंबद्दल म्हणतात, की हा ब्राह्मण इतका हुशार की ह्याने मूळ ज्ञानेश्वरीची प्रत नष्ट करून, आपल्या पदरच्या ओव्या घुसडल्या असतील. हे लेखकाचे मत, आपल्याला कादंबरीत दिसत नसले, तरी लेखकाचा ब्राह्मणद्वेष मात्र उघड होतो. मनोविश्लेषणात्मक समीक्षा ते उघड करते. मनोविश्लेषणात उदात्तीकरणाचे जे प्रकरण आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला असा आला. पार्ल्याच्या एका सभेत मी त्यांना विचारले की परंपरेच्या विरुद्ध बंडखोरी करताना तुम्ही "हिंदू" त ज्ञानेश्वरांची खिल्ली उडवलीत, स्त्रीवादाचा कैवार घेत संत रामदासांना नागड्या, पळपुट्या म्हटले, त्याच वादात गौतम बुद्धाला एक पोरगं काढून पळून गेल्याबद्दल दूषणे दिलीत, वारकरी समाजाने महारामांगांना सामावून घेतले नाही म्हणून त्यांना दूषणे दिली, तर हे सर्व तुम्ही बंडखोरीच्या आकर्षणामुळे ( किंवा खपाच्या लोभाने ?) केले असेल हे समजू शकते. पण प्रत्येक बंडखोरीत व्यवस्थेची नवीन व्यवस्था लावण्याचे सामर्थ्य असते असे जे म्हणतात तर त्याप्रमाणे बंडखोरीच्या अभिनिवेषानंतर तुम्हाला कोणती व्यवस्था येणार आहे किंवा आणायची आहे, त्याचे नेमके चित्र काय दिसते ? त्यावर ते म्हणाले की त्यांची संतांची टर उडवण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण एक सामाजिक संदर्भ देता यावा म्हणून मी हे केले आहे. हे झाले चपराक लगावण्याच्या अनिवार इच्छेचे उदात्तीकरण . व्यवस्थेत बंडखोरी करून पुढचे कुठले पडघम तुम्हाला ऐकू येतात वा दिसतात, ह्यावर ते म्हणाले की मला असे काही दिसत नाही. म्हणजे केवळ चपराक लगावून देऊन आसमंत चपापता करणे हेच मूळ होते, हे मनोविश्लेषणाने दिसते. चपराक लगावणे ही किती अनावर वृत्ती आहे, हे अजून एका उदाहरणाने दिसेल. नेमाडेंना वारकरी संप्रदायाबद्दल अप्रूप आहे व प्रसंगी त्यांनी त्यांची प्रशंसा केलेली आहे. विशेषत: महानुभाव पंथाच्या तुलनेत त्यांच्या मौखिक परंपरेने कसे साहित्य टिकवले हे ते "तुकाराम गाथा" (हे त्यांनी संपादित केलेल्या पुस्तक )च्या प्रस्तावनेत चांगले सांगतात. ह्या वारकरी संप्रदायाला त्यांनी "हिंदू"त मारलेली ही चपराक पहा :"हिंदू त (पृ.४४०):वर : ...पैठण. वारकरी पंथाबद्दल एकच मिनिटात ओळख---कसे जातिभेद मिटवले वगैरे. मुसलमान तर सोडाच, आपापल्या गावातल्या महारा-मांगानासुद्धा वारकर्‍यांनी जवळ घेतले नाही. सामावून घेणं आणखी दूरच. विठ्ठ्लाच्या चरणीं सगळे एक ? पंढरपुरात आषाढीला चोवीस सवर्णांच्या पालख्या गेल्यावर अजामेळ मांगाची शेवटून...एकादशीला मिरची, रताळं, पेरू, पपया, शेंगदाणे, खजूर, बटाटा, साबुदाणा, असले म्लेंछ यावनी पदार्थ कसे काय चालतात ? ". महाराष्ट्रात लाखांच्या संख्येने वारी करणारा, समानतेचा आदर्श असणारा, हा संप्रदाय. पण स्वत: महानुभावी पंथाचे असलेल्या नेमाडेंना, त्यात वैगुण्यच दिसते. ते सगळ्यांनाच शिव्या देतात, चपराक लगावतात, असा फक्त आव आणतात. कारण पुस्तकात कुठेच नायक असलेला खंडेराव, म्हणजे नेमाडे, महानुभाव पंथाचे काही विश्लेषण का करीत नाहीत ? उलट आत्या महानुभाव पंथाची संन्याशीण असते तिचे किती उदात्त भव्य चित्रण ! मुसलमानांबद्दल का मूग गिळून गप्प ? नायक तर पाकीस्तानात असतो. त्याला भरपूर वाव होता, मुसलमानांना चपराकी ठेवून द्यायला. ( क्रमश: २ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा