मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

भैरप्पा व नेमाडे : एक तौलनिक अभ्यास :

इतिहास व त्याकडे पाहण्याची दृष्टी:
"हिंदू"त इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी संशयाची आहे. पैकी धर्म बिघडवण्याचा दाट संशय ब्राह्मणांवर आहे. पण तो निष्कर्ष म्हणून आणि एक (डिस्कोर्स) भाषण म्हणून येते. कथानकात ब्राह्मण पात्रे व त्यांनी धर्म बिघडवण्याचे केलेले उपद्व्याप असे काही येत नाही. जी निष्कर्षे येतात ती लेखकाची/नायकाची स्वगते, किंवा भाषिते ह्या स्वरूपात येतात.
"जा ओलांडुनी" मध्ये भैरप्पांची नायिकाच ब्राह्मण असते, आजूबाजूची पात्रे लिंगायत, हरिजन, वाणी अशा वेगवेगळ्या जातीची असतात. शूद्राची मातंगी नावाची स्त्री नायिकेच्या वडिलांशी संबंध आलेली बाई असते. तिला ते शेवटी ब्राह्मण करून घेतात. नायिकाही वडिलांनी ब्रह्मोपदेश केला म्हणून जानवे घालते, हवन करते. देवळात सभेत वादविवाद करते. हरिजनाच्या एका पात्राला पूर्वी झालेल्या अत्याचार व छळवणुकीचा इतिहास कागदोपत्रांद्वारे लिहून देते. कादंबरीत जे निष्कर्ष काढलेत की प्रत्येक जात स्वत:ला ब्राह्मण समजण्याचा ( किंवा ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ ) प्रयत्न करते, ते सर्व कथानकातील पात्रे, प्रसंग, संभाषणे समर्थनासारखे सिद्ध करतात. वेळोवेळी इतिहासाबद्दल मते येतात :(पृ.२६८)"एखाद्या उद्देशासाठी त्या दृष्टीनं इतिहास लिहिणं म्हणजे इतिहासाचा दुरुपयोग करणं ह्यावर तिचा विश्वास होता. अभिमानाच्या दृष्टीनंच इतिहास पाहाणं, ठराविक राजकीय किंवा अन्य विचाराच्या पुष्टयर्थ इतिहासाचा क्रम बदलणं किंवा इतिहासाची मोडतोड करणं याला ती बौद्धिक अनीती मानत होती. तिचे प्राध्यापक सांगायचे, जीवनप्रवाह हाच इतिहास आहे. कुठल्याही सिद्धांताच्या उजेडात जीवनाचा शोध घेऊ गेलं तर त्याचा अंत लागत नाही, त्याची नेमकी विशालता समजत नाही--थोडक्यात त्याचं खरं स्वरूपच समजत नाही. सगळे सिद्धान्त जीवनातूनच निर्माण होत असतात. जीवन हाच सत्याचा आधार आहे, सिद्धान्त नव्हे. इतिहासाचही तसंच आहे. सिद्धान्ताच्या नादानं इतिहासही बदलू नये." जेव्हा जेव्हा काही समुदाय ( जसे संभाजी ब्रिगेड, मराठा लॉबी, वगैरे ) आपला इतिहास अभिनिवेशाने बदलायचा किंवा नव्याने लिहिण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना ही दृष्टी लागू होते हे वाचकाला सहजी पटते. ( क्रमश: )
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

1 टिप्पणी: