रविवार, ८ फेब्रुवारी, २०१५

आंधळे  दळताहेत व कुत्रे पीठ खाताहेत ....
साहित्याचा व्यवहार मोठा अजब पद्धतीने चालतो ! इथे कशाला चांगले साहित्य म्हणावे ह्याचे काही नक्की निकषच नसतात. जे पुस्तक खूप खपले त्याला चांगले म्हणावे तर समीक्षक म्हणतात खपण्याचा व चांगले असण्याचा अर्थाअर्थी काही संबंध नसतो ! किंवा जे लोकप्रिय ते कमअस्सल असाच साहित्यिक हेका असतो. एखाद्या लेखकाने सगळे साहित्य प्रकार हाताळलेले असतील तर तो मोठा का ? तर असे काही नाही . एकाच अभंग ह्या वृत्तात कवने लिहिणारे संत तुकाराम ह्याना कमी कसे लेखायचे ?
आपण जसे सोनाराच्या दुकानात गेल्यावर त्यालाच विचारतो की हे सोने २३ कॅरट की २४ कॅरट ? असेच मग लोक साहित्यातल्या जाणकारांना ( पक्षी प्राध्यापक, प्रकाशक, समीक्षक, विध्यार्थी वगैरे ) विचारतात की कसे आहेत हो हे नेमाडे लेखक ? त्यावेळी जर असा दबदबा असेल की त्यांनी म्हणावे आहेत बुवा ! व मग आपण ते मानावे ! असाच असतो का साहित्य-व्यवहार ?
नुकतेच ज्ञानपीठ मिळालेल्या श्री. रा. रा. भालचंद्र नेमाडे ह्यांनी ह्यावर एक छान मार्गदर्शन केले आहे. ज्याना ज्ञानपीठ किंवा नोबेल पारितोषिक मिळालेले आहे अशा साहित्यिकांना तरी आपण मोठे मानायचे का ? तर नेमाडे म्हणतात, छे, पारितोषिके कशी दिली जातात हे का आपल्याला माहीत नाही ? त्यावरून कसे कोणाला मोठे समजायचे ? उलट अशा पुरस्कार-प्राप्त लोकांची अशी टर उडवायची की कोणी मोठे उरलेच न पाहिजे . (..... मग मीच मोठा ठरणार नाही का ?). त्यात मग दया माया नाही. ज्यांच्या नावाने पुरस्कार देताहेत त्यांची तर ज्यास्तच खिल्ली उडवायची ..उदाहरणार्थ : कुसुमाग्रज . ( ह्यानाही ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता व त्यांच्या नावाचा पुरस्कार नुकताच नेमाडेंना देण्यात आला होता. ).

कुसुमाग्रजांबद्दल ते बिढार मध्ये काय म्हणतात ते पहा व ठरवा की कुसुमाग्रज कोण आहेत व नेमाडे कोण आहेत ?
बिढार ( पृ.४१) : "सकाळपासून कुसुमाग्रजाला शिव्या देतोय, कुठं म्हातारं तडफडायला आलं आमच्या नवीन पोरांच्यात ! मग मी त्याला एक क्लासिक उपमा सांगितली. भाद्रपदात नवीनवी कुत्री प्रयत्न करत असतात एखाद्या कुत्रीवर, तेव्हढ्यात एखादं म्हातारं आडदांड निब्बर कुत्रं मध्ये घुसून ताव मारून निघून जातं, तसं प्रधानचं झालं ! खरं म्हणजे सगळीकडे म्हातारी कुत्री बोकाळलीयत. साहित्य परिषदात तीच, बक्षीसात तीच, रेडिओवर , साहित्य अकादमीत, साहित्य संमेलनात---सगळीकडे हेच बाप्ये मनमुराद. तिकडे नेहरू आणि इकडे साले हे."
 " स्वातंत्र्य मिळायच्या आधी साले तरुण होते तेव्हा यांना संधी नव्हती. नुस्ते कातावले होते. सत्तेचाळीसनंतर आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर साल्या सरकारनी धडाधड उत्तेजनपर प्रकार सुरू केले. तेव्हा ही म्हातारी मंडळी त्यावेळची राहिलेली खाज भागवायला तुटून पडली. आज इतकी वर्ष झाली तरी ह्या निब्बर लोकांची चढायची हौस कमी होत नाही. तुम्हा नवीन पोरांचं कौतुक कोण करणार ह्या गर्दीत ? "

म्हणजे काय की जे साहित्याचे दळण दळीत आहेत ते आंधळे आहेत असे ठरवायचे किंवा त्याना आपल्या वाग्बाणाने आंधळे करायचे . मग जी कुत्री आजूबाजूला माजावर येउन घुटमळत आहेत त्यांनी यथेच्छ पीठ खायचे ! मग ते ज्ञानपीठ असो वा नोबेल !
( फक्त आज नेमाडे किती वर्षाचे आहेत ते विचारू नका, माजावर आहेत ना ? खाउ द्या ज्ञानपीठ !  )

----------------------------------------------------

1 टिप्पणी:

  1. एखाद्यापेक्षा आपली उंची कमी असेल तर ती वाढवून दुसऱ्याला खुजे ठरवावयाचे असेल तर एक सोपा उपाय काही लोक योजतात.आपल्यापेक्षा उंच असलेल्या व्यक्तिचे पाय कापावयाचे म्हणजे आपण आपोआपच उंच ठरतो.

    उत्तर द्याहटवा