शनिवार, ३ ऑगस्ट, २०१३

प्रसिद्ध भाषाशास्त्री अशोक केळकरांची "कोसला"वरची मते :
----------------------------------
प्रसिद्ध भाषाशास्त्री श्री. अशोक केळकर हे प्रकांड पंडित, विद्वान, भाषाशास्त्री असून ते नेहमी हसत खेळत आणि एक प्रगल्भ विनोदबुद्धी ठेवून रोखठोक लिहितात. त्यांनी "कोसला" ह्या कादंबरीवर जे परिक्षण ( पृ.२४२-२४५, रुजुवात ) लिहिले आहे त्यातले काही मोजके अभिप्राय पाहण्यासारखे आहेत :
१) "अमेरिकन लेखक जे.डी.सॅलिंजर ह्यांच्या "The Catcher in the Rye ( 1951)" ह्या कादंबरीशी प्रस्तुत कृतीची तुलना केली गेली आहे, तिच्याबद्दल दोन शब्द. कळविण्यास अत्यंत वाईट वाटते की, वाङ्मय फौजदारांना ह्यामध्ये काही मसाला मिळण्यासारखा नाही. साम्यस्थळे जरूर आहेत, पण भेद अधिक महत्वाचे आहेत.
The Catcher in the Rye ही जास्त यशस्वी कादंबरी आहे. जीवनाचा एक पट प्रथमपुरुषी निवेदनात उलगडून दाखवणे आणि कथेतल्या "मी’ला धक्का न लावता सांगायचे ते सांगून टाकणे हा तांत्रिक प्रस्न सॅलिंजर पुढेही आहे आणि तो त्याने निराळ्याच पद्धतीने सोडविला आहे.
फरक पडतो तो काय सांगायचे आहे ह्याबद्दल. "कोसला" ही अधिक गंभीर ( म्हणजे Serious; solemn नव्हे, भारतीयांच्या मनातली एक नेहमीची गल्लत ! ) कादंबरी आहे".
२) "लेखकाचे माप ह्याप्रमाणे त्याच्या पदरात घातल्यावर ( म्हणजे having given the devil his due असं मला म्हणायचं होतं ) आपल्याला एक भयानक शंका ग्रासू लागते. पांडुरंग सांगवीकर अखेर निमित्तमात्र. ज्या मृतांचे धर्म निरूपावयाचे आहेत ते शंभरातले नव्व्याण्णव नव्हे. तर स्वत:ला मृत ठरवणारे एक--जीवनमृत. कादंबरीच्या मीच्या आतला मी--गिरधर. ज्याला "स्वदेशबंधु त्याज्य : स्वग्रामबंधु त्याज्य ; संबंधित : यांचा संबंधु : तो विशेषत: त्याज्य, " ज्याला घरी राहणे दिवसेंदिवस जड होते, काही एक करायचे नाही हेच ज्याचे विहित कर्म.
अनुभवाचे विघटन, त्याचे "वगैरे"करण ही नुसती सुरुवात, जमीनीची नांगरट. त्यात पेरणी करायची, ती आपण एकटे आहोत, काम्युने चितारलेला outsider आहोत, ए.ई.हाउसमनने व्यक्तविलेल्या " a stranger and afraid, In a world I never made" ह्या जाणिवेची. आधुनिक मानवाच्या विचार-कल्पनाविश्वातली ही एक महत्वाची जाणीव. हिची जातकुळी एकीकडे शेक्स्‌पियरच्या हॅम्लेटपर्यंत पोचते; दुसरीकडे बौद्ध, जैन, ह्यांच्यापर्यंत. आधुनिक मराठी साहित्यापुरते म्हणायचे तर मर्ढेकरांचे नाव सुचते . पण मर्ढेकरसुद्धा एक आनंदी, आशावादी प्राणी होता असे तुलनेने वाटावे इतके हे दुखणे विकोपाला गेले आहे.
माणसाला संवेदनक्षमता जरूर असावी. पण तो अवघा संवेदनाच होऊन गेला, "सम्‌" जाऊन वेदनाच शिल्लक राहिली, तर ज्या विश्वाची चिंता करायची त्या विश्वाशीच संबंध तुटतो---"जैसा स्वये बांधोन कोसला मृत्यू पावे".
आता ह्या केळकरांच्या अभिप्रायाचा काय अर्थ निघतो ? एक तर सॅलिंजरची कादंबरी निवेदन शैलीने जास्त यशस्वी आहे व "कोसला" नाही . कारण नेमाडेंना काय सांगायचे आहे तेच डेंजरस ह्या अर्थी गंभीर आहे. आणि दुसर्‍या परिच्छेदात ते कसे चूक आहे ते दाखविले आहे. एकटेपणाची जाणीव जरी वैश्विक असली तरी "काही एक करायचे नाही हेच ज्याचे विहित कर्म" ही विचारसरणीच कशी चूक आहे ते केळकर एका उदाहरणाने सांगत आहेत. एखाद्या पक्षाने घरटे ( कोसला ) बांधावे पण स्वत: मरून जावे तशीच ही नेमाडे सांगताहेत ती जाणीव आहे. ह्यापेक्षा तिखट अजून कोण लिहिणार आहे नेमाडेंच्या "कोसला"-पद्धतीच्या विचारांवर ?
-------------------------------------------- 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा