रविवार, १५ मे, २०११

बख्तिनचे ओंगळ रुपडे,
हिंदू : भालचंद्र नेमाडे----३
आता कादंबरीत बर्‍याच ठिकाणी येणारे विनोद, शाब्दिक कोटया, चुटके, किस्से हे पाहू :
(पृ.१३४):आंघोळ करणार्‍या लभान्यांकडे पहात दोघे जण संवाद करतात: का रे सुदाम्या, दोघीतली कोनती चांगली लागते तुले ? गाय की वासरी ? दुसरा: आपल्यासारख्या न कांडणार्‍याला काय दोन्ही बोखारे सारखेच.ऊठ शेवटची भाकर टाकाली तव्यावर तुह्या घरात. पहिला: शेवटी आपल्याच घरातल्या तव्यावरची भाकर ऑं ? दुसरा: जे आपली तेच गोड. ("तवा गरम है"वरचे घासून घासून चपटे झालेले जोक, इतक्या प्रतिभावान लेखकाला, पाने भरायला टाकावे लागतात, म्हणजे त्यांचा लेखकरावच झालाय की काय ? का म्हातारपणी "भाकरीची" भूक प्रबळ होते ?)
(पृ.२९८):गांधीजी म्हणतात गरजा कमी करा, पण तो कोण कवी म्हणतो की गरजा जयजयकार. पाने भरण्यासाठी अशा कोट्या म्हणजे गरजवंताला ( पाने भरण्याची गरज ) अक्कल नसते ते खरेच तर !
(पृ.३७२):बोबड्या लेक्चररचे किस्से : साले जहॉंसे अच्छा...लाजाधि लाज....असे पाणचट वाचून वाचकांची बोबडीच वळणार.
(पृ.३९०): तुमची उंची किती, बेलबाला? सटपटून बोलली, चार फिट अकरा उंच...(हाय रे ह्य़ा विनोदाची उंची !)
(पृ.४५७.):युरोपात काय होतं ?...आठशे वर्ष सलग डार्क एजिस---कृष्णयुगं ? ( ---अरेरे असे चातुर्य कामी आले ?)
(पृ.१८३): ...पहा कसे जीएएनडीला पाय लावून... ( हा विनोद जी ए एन डी तच जाणार !)
(पृ.३५७): थंडी कडाक्याची..त्यांचं उठतच नाही तर लोकसंख्या कमी राहणारच...
मुळात गंभीर प्रवृत्तीच्या लेखकाने, ३५ वर्षे खपून लिहिलेल्या गंभीर विषयावरच्या कादंबरीत असले विनोद, कोट्या असाव्यात का ? ( नेमाडे टीकास्वयंवरात पु.ल.देशपांडेंनाही खरमरीत टीकेपासून माफ करीत नाहीत.) तर मग इथे असले विनोद, कोटया कशासाठी असाव्यात ? बख्तिनचे ह्याबाबत काय मार्गदर्शन आहे ? बख्तिन म्हणतो : ( पृ.२३, डायलॉगिक इमॅजिनेशन ):"पात्रांचे वाचकांपासूनचे जे अंतर असते ते हास्य-विनोद कमी करतात. आपण ज्यावर हसतो, ते आपल्या नजीक असते. विनोद-निर्मितीचे सृजन कमाल जवळिकीच्या क्षेत्रात असते. हास्यात अशी शक्ती असते की पात्रे जवळ येतात, ते अशा जाड्याभरड्या संपर्कात येतात की आपण त्यांना उलट सुलट, आत बाहेर, वरून खालून न्याहाळू शकतो. त्यांना उघडे करू शकतो, त्यांची मुक्तपणे पाहणी करू शकतो, त्यांच्याशी नाना प्रयोग करू शकतो. जगाचे असे जवळ आणणे हास्यविनोदाने शक्य होते." पण विनोदाचे दुसरे एक भागधेय बख्तिन सांगत नाही की पुष्कळ वेळा अहमहमिकेने विनोद करू जाता तो हसू आणत नाही, तर आपलेच हसे करतो. आपण विनोदांच्या कार्यक्रमात हे प्रत्यही पाहतोच. विनोद जमणे हे सर्जकतेला म्हणूनच आव्हान असते. आता ३५ वर्ष घेऊन, असे पाणचट विनोद झाले तर ते वैगुण्य आपण बख्तिनचे म्हणू शकत नाही. ह्याचे उत्तरदायीत्व नेमाडेंनाच घ्यावे लागेल किंवा कादंबरी एका बैठकीत लिहावी ( जशी कोसला ) का ३५ वर्षे खपून, हे त्यांचे त्यांनी ठरवावे. वाचकांनी हे विनोद हसण्या सारखे आहेत का हास्यास्पद आहेत, हे पहावे.
नेमाडेंच्या सर्वच कादंबर्‍या आत्मचरित्रपर असतात. त्यामुळे नायकासंबंधी त्यांचे काय व्यूह आहेत हे सहजी उमजून येते. तसेच नायकाची मते, भाषिते, निष्कर्श, आक्रोश, समजूती ह्या सर्व आपल्याला नेमाडेंच्याच आहेत असे मानावे लागते. आपण वर पाहिलेच की टीकाकार म्हणून नेमाडेंना वाटते की नायकाने/लेखकाने काही एक निश्चित नैतिक भूमिका घेऊन कथेत वावरावे लागते. ह्याला बख्तिनचाही पाठिंबा मिळतो तो असा : ( पृ.३८, डायलॉगिक इमॅजिनेशन ): " कादंबरीत नायक वा पात्रे एक आदर्शवादी रूप घेतात व त्याने त्यांची प्रतिमा बदलण्यास मदत होते. पूर्वी हे सॉक्रेटिसच्या प्रतिमेमधून साधल्या जायचे. एक नियम म्हणून सांगता येईल की, कादंबरीत नायक हा बहुतेक करून एक आदर्शवादी असतो." नेमाडेंनी कादंबरीचे नाव दिलेय "हिंदू" व मलपृष्ठावरही सांगण्यात आलेय की हिंदू धर्मातल्या नाना घडामोडींमुळे ह्या धर्मात एक प्रकारची अडगळ साचून राहिली आहे. कादंबरीचे उपशीर्षकच "जगण्याची समृद्ध अडगळ" असे आहे. मग हे कादंबरीत का दिसत नाही. ब्राह्मणांमुळे अडगळ साचली असे कादंबरीत नाहीय, केवळ हिंदू धर्मामुळे नाही तर वैश्विक अशा घडामोडींमुळे सर्वांकडेच अशी समृद्ध अडगळ जमते आहे, ही वस्तुस्थिती आपण जाणतोच. असेच कथानकात आहे. पुस्तकाच्या सुरुवातीस असलेल्या पसायदानात लेखकाने वैश्विक भान मागावे व स्वत: कथानकात कोणत्याही समर्थनाशिवाय केवळ हिंदू धर्मामुळे अडगळ साचतेय असा निष्कर्श काढावा ह्यात आदर्शवाद न दिसता साध्या विचारशक्तीची दिवाळखोरीच ज्यास्त दिसून येते. निश्चित नैतिक भूमिकेचे हे कसले समर्थन ? तसा साधा प्रयत्नही दिसून येत नाही. आदर्शवाद दिसणे तर दूरच. शेतकर्‍याची विदारक परिस्थिती छान रंगवून होते. पण नायकाचा आदर्शवाद त्यावरचा काही मार्ग दाखवत नाही. उलट एक अगतिकताच दाखवतो. वृद्धापकाळी नायकाच्या मुलाने गावी येणार नाही म्हणावे, सोयीसाठी दहिसरला फ्लॅट घ्या म्हणावे व नायकाने तसे करावे ह्यात नेहमी दिसते तशी अगतिकताच, मेलोड्रामा सारखी दिसते. शहरीकरणा विरुद्ध बोलणारा नायक व प्रत्यक्षातला लेखक आनंदाने शहरी होतो, स्त्रिवादापायी समर्थांची, गौतमाची खिल्ली उडवणारा नायक हा स्वत: मात्र लग्न करू इच्छित नाही, आत्यावर झालेल्या वारसाहक्क डावलण्यावर तोडगा काढू शकत नाही, हे अतिशय निराशाजनक आहे व बख्तिनच्या मार्गदर्शनाविरुद्ध आहे. तमाशा कलावंतांच्या जीवनाची ससेहोलपट चालूच रहावी व त्यावरचा नटरंग सिनेमा मात्र खूप चालावा, किंवा शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या चालूच रहाव्यात व त्यावरची चित्रणे कादंबरीत छान झाली आहेत असे म्हणावे, ह्यातला विरोधाभास उघड दिसणारा आहे. हे कलेचे यश नाही, निश्चित नैतिक भूमिकेचे निदर्शक नाही, अगदीच डेली सोप च्या वळणाचे मात्र होते. त्याला उदात्ततेचा रंग कसा यावा ? मग कादंबरीला यमुनापर्यटनी म्हणावे का कुठलीच निश्चित नैतिक भूमिका न दिसणारी रीती-प्रधान म्हणावे ?
(क्रमश: )

1 टिप्पणी:

  1. नमस्कार !
    आपण बरोबर लिहीले आहे. जायची वेळ आली की लोक सैरभैर होतात, मग त्यांच्या हातून असले भिकार लेखन होते याबद्दल माझ्या मनात बिलकूल शंका नाही.

    उत्तर द्याहटवा