भैरप्पा व नेमाडे--एक तौलनिक अभ्यास
विद्रोह व बहु-आवाजी रेखाटन:
आता बंडखोर प्रवृत्तीचं द्योतक असलेलं एक उदाहरण पाहू. विद्रोहाला भडक रंग द्यावा, मग दिसण्याची तमा बाळगू नये, असे जणु धोरणच असलेले नेमाडे (पृ.२५३) वर एक प्रसंग असा रेखाटतात : "शांतता चिरणारा बनी रांड हिचा कोळीवाडयातून धारदार आवाज...पन तू कोनता सत्वाचा हायेस महात्मा गांधीच्या लवडयाचा ते पाहतेच मी बी, तुह्या बहीनचा झौ...तोंडाची गांड करतूस..."
आपल्याच बापाला शिव्या घालायच्या म्हणजे प्रचंड धैर्य लागते. तशी जिगर लागते. पण एकदा बापालाच घाणेरड्या शिव्या हासडल्या की मग कोणी आपल्या वाटेला धजत नाही. मग महात्मा गांधी भले राष्ट्राचे पिता असले तर त्याचे काय हो ? साहित्यिकांना रांडेचे अप्रूप असणे समजू शकते ( कारण कुणाकुणाच्या धर्मपत्न्या सोडून गेलेल्या असतात ! ). पण हे पात्र काही "ब्राह्मणांनी हिंदु धर्म बिघडवला" ह्या मध्यवर्ती "निश्चित नैतिक’ भूमिकेच्या फारसे जवळचे नाही. शिवाय कायम हरिजनांचा कैवार घेणारे महात्मा गांधी हे काही लेखकाच्या वा नायकाच्या जाती विरोधातले नव्हते. बरे एखाद्या रांडेने ठरलेले पैसे न देणार्या कादंबरीकाराला अशा शिव्या हासडल्या तर ते क्षम्य करता येईल. पण तिने डायरेक्ट महात्मा गांधीलाच हात लावावा हे असंभव व अर्वाच्य ! महात्मा गांधींवर अनेकांनी टीका केलेली आहे. पण ही अगदी खालच्या पातळीची तळ गाठते. रांडेचे चित्रण वास्तवादी करण्यासाठी तिने शिव्या देणे क्षम्य असले तरी तिने थेट महात्मा गांधींनाच शिव्या देणे अनावश्यक आहे. अर्थात रांडात पक्षीय अभिनिवेश असतो असे लेखकाला सूचित करायचे असेल तर मग हे चित्रण पुरेसे केलेले नाही असेच म्हणावे लागेल. महात्मा गांधींचे चित्र असलेला साहित्य अकादेमीचा पुरस्कार घ्यायला मात्र आता नेमाडेंना अमळ अवघडच जाणार आहे !
भैरप्पांच्या कादंबरीत महात्मा गांधींचे शिष्य राहिलेली दोन पात्रे आहेत. एक बेटटया व दुसरे मंत्री. मुख्य पात्र असलेल्या सत्या हिचे वडील आपली मुलगी (जी ब्राह्मण आहे), लिंगायतांच्या घरात लग्न करते आहे, त्याने व्यथित झालेले असतात. त्या वेडाच्या भरात ते तिला वहाणेने बेदम मारतातही. चूक समजल्यावर स्वत:लाही चपलेने मारून घेतात. त्यांना समजावयाला आलेल्या त्यांच्या हरिजन मित्राला ( बेट्टयाला ), ते इथे (पृ. १७३ ) पहा कसे बोलतात: "काय केलंत हे ? स्वत:च्या देहाला केली तरी हिंसा, हिंसाच नाही का ? महात्मा म्हणत होते---"."तुझ्या महात्म्याचं इकडं काही सांगू नकोस. पित्त खवळलेला म्हातारा तो ! एवढ्या जखमांनी काही होत नाही. माझ्या मुलीची हकीकत सांग-- म्हणत ते त्याच्या पासून दोन हात अंतरावर बसले". संयमित अविष्कार करीत महात्म्याचा विरोध नोंदवणे हे अवघड काम भैरप्पा इथे अपार कौशल्यानं करीत आहेत. उगाच माथे भडकवणारे शब्द न वापरता ! असेच एका क्रांतीकारी पात्राच्या तोंडी ( पृ.२०८) गांधीविरोधातले हे वक्तव्य पहा: "शिकत असताना सांगितलेलं ऐकत होता तो. आता त्याची वेगळीच लाईन झाली आहे. महात्मा गांधींचं किंवा अहिंसेचं नाव काढलं तर रागानं फणफणतो नुसता ! आता तो क्रांती-आंबेडकर म्हणत असतो. मला तर त्याची काळजीच वाटते." शेलक्या शिव्या न वापरता किती नेमकेपणाने भावना व्यक्त होताहेत इथे. असाच वस्तुपाठ भैरप्पा पृ.२५३ वर असा घालून देतात: "--छे ! असं नाही त्या विचारात गुंतणं बरं नव्हे. आहे त्या परिस्थितीत काय करता येईल हे पाहिलं पाहिजे. अकबरानं राजपूत राजकन्यांनी आपला जनानखाना भरला आणि तो एवढा मोठा सम्राट झाला म्हणे. पण हे लोकसत्ताक राज्य म्हणजे---इतिहासाशी तुलना करता करता त्यांच्या तोंडून इरसाल शिव्या उधळल्या जात." शिव्यांचा वर्षाव न करता भैरप्पा तोच परिणाम इथे कसा साधतात हे पाहणे कौतुकाचे आहे. बख्तिन ह्या समीक्षकाने म्हटल्याप्रमाणे सत्य हे जर बहु-आवाजात वसत असेल तर अशा बहु-आवाजांचा कोलाहल ( कार्निव्हल ) वाटेल तितपत चित्र रेखाटणे हे कादंबरीकाराचे एक कसबच म्हणायला हवे. ह्या दृष्टीने पाह्यले तर नेमाडेंच्या कादंबरीतले आवाज शिव्या देणारे एकसूरी वाटतात तर भैरप्पांच्या "दाटू" त आवाजांचे वैविध्य दिसते. कथानक गांधी ह्या व्यक्तीच्या तत्वांना सहानुभूतीपूर्ण असूनही गांधीविरोधी आवाजही भैरप्पा वर दाखविले तसे देतात. अजून एका ठिकाणी ( पृ.१२०) ते एक प्रवाद असाही देतात: "गांधी वैष्णव जातीचा म्हणे. आपल्या जातीची माणसं ज्यास्त व्हावीत म्हणून त्यानं हा डाव टाकलाय ! मागं रामानुजाचार्यांनीही असंच करून महारा-मांगांना उभं नाम लावून आपल्या धर्मात घेतलं तसं ! लिंगायत मुखंडांनीही आपली शंका व्यक्त केली." विद्रोह व बहु-आवाजी चित्रण असावे तर असे ! ( क्रमश:)
आपण भैरप्पांच्या पुस्तकांचे परीक्षण देवू शकाल काय? आपण त्यांची खूप पुस्तके वाचली असावीत आणि इतरांना तुमच्या परीक्षणाचा नक्कीच फायदा होईल.
उत्तर द्याहटवाफार अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद लिहिलं आहे. आपण सगळे लेख एकत्र करून पुस्तक प्रकाशित करू शकता. शुभेछा.
visleshan changal ahe matra bhaleravana bramhanancha aani gandhicha pulka alela distoy.
उत्तर द्याहटवाtyani gandhicha charitra vachun to kiti rangila hota he pahave. tyancha lihinyachya style varun te bramhanetar vattat nahit.