मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३

हेच का नेमाडे ?








"बिढार" ( पृ.४१-४२) ले: भालचंद्र नेमाडे
''सकाळपासून कुसुमाग्रजाला शिव्या देतोय, कुठं म्हातारं तडफडायला आलं आमच्या नवीन पोरांच्यात ! मग मी त्याला एक क्लासिक उपमा सांगितली. भाद्रपदात नवीनवी कुत्री प्रयत्न करत असतात एखाद्या कुत्रीवर, तेवढय़ात एखादं म्हातारं आडदांड निब्बर कुत्रं मध्ये घुसून ताव मारून निघून जातं. तसं प्रधानचं झालं! खरं म्हणजे सगळीकडे म्हातारी कुत्री बोकाळलीयत. साहित्य परिषदांत तीच, बक्षिसांत तीच, रेडिओवर, साहित्य अकादमीत, साहित्य संमेलनात-सगळीकडे हेच बाप्ये मनमुराद. तिकडे नेहरू आणि इकडे साले हे..''
    " स्वातंत्र्य मिळायच्या आधी साले तरुण होते तेव्हा यांना संधी नव्हती. नुस्ते कातावले होते. सत्तेचाळीसनंतर आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर साल्या सरकारनी धडाधड उत्तेजनपर प्रकार सुरू केले. तेव्हा ही म्हातारी मंडळी त्यावेळची राहिलेली खाज भागवायला तुटून पडली. आज इतकी वर्ष झाली तरी ह्या निब्बर लोकांची चढायची हौस कमी होत नाही. तुम्हा नवीन पोरांचं कौतुक कोण करणार ह्या गर्दीत ? "

--------------------
तर नेमाडेंच्या मते कुसुमाग्रज हे निब्बर व आडदांड कुत्र आहेत. अप्रतीम उपमा आहे. पूर्वी दत्ताच्या तसबिरीत श्वान दाखवलेले असत. श्वान म्हणजे देवाचे लाडके. त्यातल्याच एका आडदाड श्वानाचे प्रतीक करीत कुसुमाग्रजांना नेमाडे ह्यांनी हा बहुमानच केला आहे. ह्याच प्रतिमासृष्टीचे देखावे बघताना मग संजय भास्कर जोशी हे अजून एका डॉग-स्क्वॅड मधले श्वान वा चालक असावेत. त्यांनी इतर पुस्तकांचे गठ्ठे हुंगून हुंगून नेमाडेंचे साहित्य बिनधोक ठरवले हे बरे झाले ! आता त्यावर इतर श्वान मंडळी आपापली तंगडी वर करतीलच !
आता ह्या श्वान प्रतिमेला जागून स्वत: नेमाडे हे कुठल्या प्रकारचे श्वान आहेत असा प्रश्न निर्माण झाला तर त्यांच्या झुबकेदार मिशा आठवा व आठवा एक लाडके केसाळ श्वान, ज्याचे तोंड कुठे व ढुंगण कुठे हे दाट केसाळ प्रतिमेत दिसत नाही. हेच का नेमाडे ?
-----------------------

गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१३

----------------------
ओवेसी कदाचित उदारमतवादी---नेमाडे ?
--------------------------------------------
    श्री.श्रिकांत उमरीकर ह्यांनी भालचंद्र नेमाडे ह्यांची ४० वर्षांपूर्वीची एक कविता देत नेमाडे कसे उस्फुर्तपणे धर्मांध मुस्लिमांना जवाब देत आहेत, त्यांच्या तुमानीत...वगैरे.. त्याची वाखाणणी केली आहे.
    कदाचित श्रेष्ठ विचारवंतांचे हे एक लक्षण असावे की त्यांच्या साहित्यात कायम परस्पर विरोधी विचारांचे दर्शन होत असते. कारण १९८३ साली लिहिलेल्या ( म्हणजे ३० वर्षांपूर्वी ) एका लेखात ते म्हणतात : ( टीकास्वयंवर पृ. १२०, ):
"देशीयतेचा अतिरेक एखाद्या समाजाला आत्मकेंद्रित करून र्‍हासशील करू शकतो, हे आपण मागे अंतर्जननासंबंधीच्या चर्चेत उल्लेखले. जगातल्या इतर समाजापासून विभक्त राहाण्याची प्रवृत्ती त्यामुळे आपोआपच बळावते. एक प्रकारचा वंशाभिमान आणि आत्मसंतुष्ट जीवनव्यवहार अशा समाजात वाढतात. साहजिकच अशा संस्कृती परकीय आक्रमणात नष्ट होण्याची भीती असते. अल्‌-बिरुणीने इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या आधी अस्तित्वात असलेल्या ब्राह्मण-केंद्री हिंदू समाजात अशा देशीयतेचा अतिरेक अतिशय स्पष्टपणे वर्णिलेला आहे. तथापि हिंदुस्थानला आपला देश मानून निर्माण झालेल्या, उदारमतवादी मुसलमान वर्ग आणि महानुभाव-वारकरी अशा ब्राह्मण्यविरोधी संप्रदायांनी देशभर उभारलेल्या आत्मशुद्धीपर देशीवादी चळवळींनी हिंदुस्थानातील समाजाचा पाया पुन्हा नव्याने घालून सर्वनाश चुकविला....... "
    नेमाडेंच्या आगामी हिंदूनंतरच्या कादंबरीत कदाचित मुसलमानांच्या उदारमतवादाचे चित्र पहायला मिळणार असावे. कारण हिंदूतला हिरो पाकिस्तानात असूनही त्यात मुसलमानांसंबंधी काहीच ( चांगले वा वाईट ) नव्हते. कदाचित ब्राह्मणांनी हिंदू धर्म बिघडवला हे प्रमुख चित्र दाट करण्यासाठी त्यांनी हे केले असावे. आता मुसलमानांच्या तुमानीचे काही खरे नाही. बा अदब, मुलाहिजा....उदारमतवादी महानुभाव-मुसलमान-युती येत आहे..!
------------------------------------------------------------